Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Tendernama Impact : 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर ZP सीईओंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी; काय दिले आदेश?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी जलजीवन मिशन ही योजना राबवली जात असली तरीही अगोदरच्या फेल झालेल्या पाणीपुरवठा योजनासारखी या योजनेला घरघर लागल्याचे टेंडरनामाने उजेडात आणताच झेडपी सीईओ विकास मीन यांनी अधिकाऱ्यांचे कान पिळले.

या उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुठल्याही गावात कुणाचा मृत्यु झाल्यास कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याची ताकीद त्यांनी अधिकारी व कंत्राटदाराला दिली आहे.‌

टेंडरनामाच्या वृत्तानंतर त्यांनी तातडीने जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांसह सर्वं कंत्राटदारांसोबत आढावा बैठक घेतली.‌ या बैठकीत झेडपीचे सीईओ विकास मीना यांनी अधिकाऱ्यांचे व कंत्राटदारांचे चांगलेच कान पिळले. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कामे खोळंबली असून काही ठिकाणी कामे सुरूच न झाल्याचे टेंडरनामाने उघड करताच त्यांनी सर्व संबंधित उप अभियंता, शाखा अभियंता, जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेत चांगलीच खरडपट्टी काढली. या बैठकीला पाचारण करूनही उपस्थित न राहणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून ‘हर घर नल से जल’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. याकडे लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या लोकप्रतिनिधींचे देखील लक्ष नाही.

ग्रामीण भागातील प्रत्येक घराला ३१ मार्च २०२४ अखेर नळाद्वारे शुध्द पाणी देण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार १५९ योजनांची कामे पूर्ण करण्याची ३१ मार्च २०२४ ची मुदत होती. परंतु, मागील दोन ते तीन वर्षांत यापैकी केवळ ६६६ योजनांची कामे पूर्णत्वाकडे गेली असून, जवळपास ५०० कामे अजूनही २५ ते ७५ टक्क्यांपर्यंत सुरू आहेत.‌ तथापि, या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही यंदा जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठल्यामुळे अपेक्षित यश गाठता आले नाही.‌

टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,१५९ योजनांच्या कामांना कार्यांरंभ आदेश देण्यात आले होते.‌ यासाठी ६७७  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.‌ यातील काही कामांची जबाबदारी जीवन प्राधिकरणावरही देण्यात आली आहे.

दरम्यान मागील दोन वर्षांपासून जि.प.पाणीपुरवठा विभागाने १,१५९ योजनांच्या कामे गतीने व्हावीत, यासाठी सातत्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केला.‌ मात्र काही ठिकाणी ग्रामस्थ, सरपंच व कंत्राटदारांमध्ये बेबनाव झाल्यामुळे कामे रखडली. यापूर्वी मीना यांनी सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांच्या बैठका घेऊन तक्रारी ऐकून घेतल्या होत्या, तसेच कामे सुरू न करणाऱ्या ४५ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

योजनांची कामे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक कुटुंबातील दरमाणसी ५५ लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ८२२ घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत ३ लाख ९७ हजार ९०१ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरल्याने पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नळाला कधी आठ दिवसांतून, तर अनेक ठिकाणी नळ कोरडेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

मार्च २०२४ अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मुदत दिली होती.‌ दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास निम्मि कामे अपूर्णावस्थेत असल्याचा भांडाफोड करताच आता मीना यांनी कोमात असलेली जलजीवन मिशन जोमात आणण्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांना कठोर शब्दांत तंबी दिली आहे.