Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Solapur Dhule Highway : छत्रपती संभाजीनगरात सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाची का लागली वाट?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मुख्य जलवाहिनीसाठी चर खोदल्याने सातारा - देवळाई ते तिसगाव पर्यंत सातारा परिसरातील नवीन बीड बायपास अर्थात सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. एन एच - ५२  या रस्त्याची वाट लागली आहे. एनएचएआय माध्यमातून बांधकाम झालेल्या या महामार्गाचे दोन वर्षांपुर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले होते. महामार्गातील रस्त्याची अंदाजे तीन ते चार किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूने अल्पावधीत दुरवस्था झाल्याने सातारा - देवळाई - तिसगाव येथील  ग्रामस्थ आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जुना बीडबायपास राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ हा रोड दोन्ही बाजूने दाट वसाहतीतून जातो. आधीच मृत्युचा महामार्ग समजल्या जाणाऱ्या जुन्या बीडबायपासवर गत दहा वर्षांत शेकडो मृत्युचा आकडा आणि अनेक कायमस्वरूपी जायबंदी झाल्याने सोलापूर - धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. एन एच - ५२ आडगाव मार्गे आडगाव ते करोडी असा ३० किमी लांबीचा बांधण्यात आला आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना हा मार्ग शहराबाहेरून काढण्यात आला आहे. आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

जुन्या बीडबायपासवर जड वाहतुकीचा अडथळा होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये व  दळणवळणाची चांगली सोय होण्यासाठी आडगाव ते करोडी या तीस किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम केंद्रीय मार्ग निधीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने करण्यात आले होते. या कामावर जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीच्या ठेकेदाराने जेसीबी आणि पोकलॅन मशिनच्या साह्याने १५००, २५००, ६०० व ५०० एम.एम. व्यासांच्या मुख्य जलवाहिनीसाठी कांचनवाडी ते सातारा व देवळाई तसेच तिसगावच्या दिशेने मोठमोठे चर खोदले आहेत. यात साईनबोर्ड, पथदिव्यांची विद्युत केबल, दिशादर्शक फलक, क्रॅश बेरिअर आणि जोड रस्त्यांचे अतोनात नुकसान केले आहे. जोड रस्त्यांचे खोदकाम केल्याने हे रस्ते काही ठिकाणी खराब झाले आहेत.

जलवाहिनी गाडल्याने काही भागांत उंचवटे तर काही भागात खड्डे झाले आहेत. खडी वर आली आहे. त्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भात एनएचएआयएच्या संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता रस्त्याची नुकसान भरपाई द्यावी म्हणून आम्ही ५० कोटीची नुकसान भरपाई द्यावी, अशी नोटीस ठेकेदार कंपनी व एमजीपीला बजावली होती. मात्र एमजीपीने खोदकामानंतर रस्ता दुरूस्तीची टेंडरमध्ये तरतूद असल्याचा खुलासा केला आहे व दुरूस्तीची हमी दिल्याचे ते म्हणाले. मात्र ठेकेदार जवळपास आठ ते दहा महिन्यांपासून अत्यंत कासवगतीने काम करत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे, यावर कुणीही बोलायला तयार नाही.