Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : टाकळी शिंपी गावातील मुख्य रस्त्याचा प्रश्न 13 वर्षांपासून का रेंगाळला?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरालगतचे टाकळी शिंपी हे गाव शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ म्हणून चिकलठाणा आठवडी बाजार, तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचा आठवडी बाजार. बाजार समितीमध्ये येण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना पक्क्या रस्त्यांची गरज असते. पण नेमक्या या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.

टाकळी शिंपी हे गाव गोदेच्या कुशीत आहे. भाजीपाल्यासाठी आणि मोसंबीच्या मोठ्या फळबागांसाठी हे गाव ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव छत्रपती संभाजीनगर ते जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेला तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील नांदेड ते औरंगाबाद लोहमार्गावरील शंकरवाडी नाला क्रमांक १४६ मधून या गावाची तीन किलोमीटरची बिकट वाट आहे.

टाकळी शिंपीतील तीन किलोमीटर रस्ता संपूर्ण खड्ड्यात गेलेला आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच गावालगत सुखनाधरण व नदी आहे. वाळूची मागणी छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे. इकडे वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. वाळूने भरलेले ट्रक याच मार्गाने जात असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा महसुली अधिकारी याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात येत आहे. मागील तेरा वर्षांपासून टाकळी शिंपी या गावातील मुख्य रस्त्याचा प्रश्न रेंगाळत आहे.

जालनारोडपासून आत गेल्यावर पाचशे मीटर अंतरावर रेल्वे रुळाखालून शंकरवाडी नाला आहे. पावसामुळे नाल्याला पूर येतो. त्यामुळे बऱ्याच वेळा गाव, तांडा आणि शेतवस्त्यांचा संपर्क तुटतो. परिणामी आजारी रुग्ण, कामगार, विद्यार्थी, छोटेमोठे फेरीवाले यांना प्रतीक्षा करावी लागते. एकदा सुरू झालेला पाऊस थांबला नाही तर नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्यात दुसरा रस्ता नसल्याने पाणी कमी होण्यासाठी थांबावे लागते.

नाल्यातून कंबरे एवढे पाणी वाहते. मुसळधार पावसाने हाहाकार माजवला तर रेल्वे रुळाच्या पुलाखालून पाणी वाहत असल्याने काही वेळेसाठी टाकळी शिंपी, टाकळी वैद्य व चितेगाव भालगाववासियांचा इतर गावांशी संपर्क तुटतो. जनजीवन विस्कळीत होते. यावर रेल्वेने देखील काहीतरी उपाय योजना करावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.