Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : निकृष्ट रस्ता; पालिका प्रशासकांचा कारवाईचा दिखावा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील जवाहरनगर ते टिळकनगरपर्यंत होत असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल टेंडरनामाने केली. याच वृत्तावर शिक्कामोर्तब करत आयआयटीने देखील काम आयआरसीच्या माणकानुसार झाले नसल्याचा अहवाल दिला. सोबतच इतर रस्त्यांचा सरफेस उखडला तसेच भेगाही पडल्याचे अहवालात नमुद केले. टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर आणि पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांनी या रस्त्याची पाहणी केली. यात केवळ चेतक घोडा चौकातील ड्रेनेज दुरूस्ती आणि रस्त्यावरील अर्धवट काम पुर्ण करा, असे म्हणत या रस्त्याची पुर्ण पाहणी न करताच प्रशासकांनी मोर्चा दुसरीकडे वळवला.

याआधी रस्त्याची दुसरी बाजु झाल्यानंतर खराब झालेल्या काँक्रिट रस्त्याचा पृष्ठभाग दुरूस्त करण्यात येईल, असे टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.  दरम्यान, ठेकेदाराने रस्ता दुरूस्त न करता दुसऱ्याच रस्त्याचे बांधकाम हाती घेतले. रस्त्याची पाहणी करताना देखील प्रशासक तथा आयुक्तांना निकृष्ट कामाच्या पाहणीचा विसर का पडला, हा संशोधनाचा विषय आहे.

शहरातील गारखेडा आणि शहानुरवाडीला जोडणारा जवाहरनगर ते टिळकनगर पर्यंतचा सिमेंटरस्त्याचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, या कामातील फोलपणा व ठेकेदाराच्या निकृष्ट कामाच्या नमुना टेंडरनामाने उघडकीस आणला आहे. या रस्त्याचे खोदकाम न करताच आहे त्या स्थितीत काँक्रिटीकरण करण्याचा प्रताप करण्यात येत आहे. शिवाय रस्त्याची दुसरी बाजु करण्याआधीच पहिल्या बाजुचे वाटोळे झाले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी टेंडरनामाकडे कैफियत मांडली ठेंडरनामाने काही तज्ज्ञांसह या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर थातुरमातूर होत असलेल्या या कामाबाबत आवाज उठविला. तसेच अनेक ठिकाणी उखडलेल्या खड्ड्यांची व मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगांची चित्रे महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांच्यासह उपमुख्याधिकारी सौरभ जोशी, अतिरिक्त मुख्याधिकारी यांना पाठवले. याच बरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हर्सुल ते पिसादेवी, दमडीमहल ते चंपाचौक, प्रतापगडनगर ते देवानगरी या रस्त्यांचे काम अशाच पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा देखील टेंडरनामाने भांडाफोड केला.

या सर्व प्रकाराबाबतची माहिती भाजपचे शहर प्रमुख शिरिष बोराळकर, आमदार तथा सहकार राज्यमंत्री अतुल सावे यांनी टेंडरनामा वृत्ताचे हवाले देत थेट या निकृष्ट कामाबाबत विचारणा केली. त्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी रस्त्यांची पाहणी करत ठेकेदाराला कामाबाबत खडे बोल सुनावले. दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेले रस्ते शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असून, रहदारीसाठी नागरिक या रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच या रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पाणी सर्वांत जास्त साचत असते. शहरातील सर्वांत जास्त पाणी असणारे हेच  मुख्य रस्ते आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे संबंधित ठेकेदार, स्मार्ट सिटी  प्रशासन साफ दुर्लक्ष करीत असल्याचे एकंदरीत चित्र या घटनेवरून उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

३१७ कोटींतून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १११ अकरा रस्त्यांचे काम टप्प्याटप्प्याने होत आहे. जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर या एकाच रस्त्याचे काम सुमारे सहा कोटी २८ लाख रकमेचे आहे. मात्र, इतकी मोठी रक्कम खर्च करूनही कामाचा दर्जा राखला जात नसेल, तर याला काय म्हणावे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगत आहे. मुळात  रस्त्याच्या होणाऱ्या निकृष्ट कामांबद्दल त्या-त्या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन कामाला विरोध केला पाहीजे व काम दर्जात्मक काम करण्यास यंत्रणेला भाग पाडले पाहीजे. त्यासाठी  परिसरातील नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनी आपापल्या भागात होत असलेल्या  निकृष्ट कामांना विरोध केला पाहिजे.