Road
Road Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar-Paithan रस्ता चौपदरीकरणात NHAI, GVPR ,MJP यांच्यात वादाचे कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : संभाजीनगर ते पैठण या महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाच्या कामावर "टेंडरनामा"ने प्रहार करताच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कासवगतीने होत असलेल्या रस्ते चौपदरीकरणाबाबत "जीव्हीपीआर" कंपनीवर खापर फोडले आहे. जीव्हीपीआरने रस्त्यालगत खोदकाम आणि पाईप ठेवल्याने काम वेळेत पूर्ण होणार कसे, असा दावा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केला आहे. कामात 'जीव्हीपीआर"ने खोडा घातल्याचा आरोप करत यासंदर्भात एमजेपीचे मुख्य अभियंता व उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला वारंवार निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांच्याकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यावर राज्य सरकारने योग्य तो तोडगा काढावा, यासाठी कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. गेल्या नऊ महिन्यात एकूण ४२ किमी पैकी केवळ पाच किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण झाले आहे. केवळ अडीच किलोमीटर रस्त्यावर डांबराचा पहिला लेअर टाकण्यात आला आहे. आयआरसीच्या एसपी. ८४ या आवृत्तीनुसारच केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार रस्त्याचे काम चालु असल्याचा दावा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केला आहे.

गेल्या दोन दशकापासून केवळ उद्घाटनाच्या पाट्यांनी रंगलेल्या पैठण रस्त्याच्या कामाला "टेंडरनामा"च्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर मुहुर्त लागला. गेल्या नऊ महिन्यांपूर्वी कामाला सुरूवात झाली. कोणत्याही भूसंपादनाशिवाय आहे त्याच जागेत टेंडरमधील अंतिम रकम ठरलेल्या २९० कोटी रूपयातून ४२ किलोमीटरच्या रस्त्याला सुरूवात झाली. दुभाजकाच्या दोन्ही बाजूने साडेसात मीटर रस्ता आणि दिड मीटरचे शोल्डर असा हा चौपदरी रस्ता होणार आहे. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून रस्त्याचे काम अंत्यंत कासवगतीने व निकृष्ट पध्दतीने सुरू असल्याची तक्रार माजी आमदार संजय वाघचौरे यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. सदर बांधकामाचे थर्ड पार्टी इन्सपेक्शन व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी थेट "टेंडरनामा" प्रतिनिधीशी संपर्क करत कैफियत मांडली होती.

प्रतिनिधीने त्यांच्या तक्रारीची दखल घेत थेट छत्रपती संभाजीनगर ते पैठण या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. यासंदर्भात सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने "जीव्हीपीआर" कंपनीमुळे कामात अडथळा येत असल्याचे म्हणत संपूर्ण खापर कंपनीवर फोडले आहे.सदर कंपनीचे प्रकल्प संचालक तसेच एमजेपीच्या मुख्य अभियंत्यांसह उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीला सागूनही फायदा होत नसल्याने आता थेट राज्य सरकारकडे कैफियत मांडणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मत आहे.दुसरीकडे पाणी योजनेवर राज्य सरकार , उच्च न्यायालय आणि एमजेपीसह ठेकेदार कंपनीचे विशेष लक्ष आहे. ठेकेदाराककडून गतीने काम करून घेत असल्याचा प्रयत्न करून घेत आहोत. छत्रपती संभाजीनगरसाठी रस्त्याबरोबरच पाणी देखील तितकेच महत्वाचे आहे. राजमार्ग प्राधिकरणाने सहकार्य करावे , अशी भूमिका एमजेपीची आहे. मात्र महामार्गाच्या कामात खोदकाम आणि पाईपांचा मोठा अडथळा आणि कंपनीच्या जडवाहतूकीने तयार केलेला रस्ता खराब होत असल्याचे राजमार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.