Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक आमखास मैदानाची कोणी केली दुर्दशा; जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकेकाळी भल्याभल्यांची सभा गाजवणाऱ्या ऐतिहासिक आमखास मैदानाची दशा व दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवमल्हार शक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकसंग्राम पक्षाचे नेते व प्रसिद्ध व्यावसायिक दिलीप आग्रहारकर व इतर पालकांनी आमखास मैदानाच्या दशावतारासंदर्भात तक्रार केल्यानंतर प्रतिनिधीने शनिवारी (२० जुलै )रोजी शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह पाहणी केली असता भयंकर दुरावस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.‌ यावेळी काही शाळा लाखो रुपये शुल्क जमा करून अशा घाणेरड्या मैदानात स्पर्धा भरवून येथे खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करून मुलांच्या आरोग्याशी नव्हे, तर जीवाशीच खेळ करत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

मैदानाच्या सर्व बाजुंनी कोलमडलेल्या आणि खिंडार पडलेल्या भिताडांवर जी-२० च्या दरम्यान नगरविकास विभागाकडून शहराच्या पायाभूत सुविधांसाठी मिळालेल्या कोट्यावधी रूपयातून लाखो रूपये खर्च करून मिळालेल्या निधीचा कंत्राटदार आणि अधिकार्यांची तुंबडी भरण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाचे फलक रंगवत  तुटक तुटक भिंतीवर रंगरंगोटी करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूचे चित्र रेखाटले आहे. त्याच धर्तीवर या खेळाडूंचा आदर्श घेत आमखास मैदानावर प्रत्यक्षरीत्या खेळाडू खेळत असतात. मात्र ते संपुर्ण मैदान चिखलाने आणि कचर्याच्या ढिगार्यांनी व्यापून गेलेले आहे. मैदानात जागोजागी कचर्याचे ढिग, प्लास्टिक कचरा, गाजर गवत व जंगली झुडपांनी आकाशाला गवसणी घातली आहे. मोकाट कुत्रे व इतर जनावरांची विष्ठा मैदानात मुबलक प्रमाणात पसरलेली आहे.‌ जणू काही ही ओसाड जागा जनावरांचा गोठा आणि कचरा डंपींग ग्राऊंड असल्याचा भास निर्माण होत आहे. अशा घाणेरड्या मैदानावर शहरातील नामांकित शाळा विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे क्रीडा शुल्क पालकांकडून वसूल करते आणि त्या मुलांना विविध क्रीडा सामने खेळविण्यासाठी या बकाल मैदानावर पाठविले जाते.

विविध निवडणुकांच्या काळात राजकीय पुढारी, आमदार, खासदार व विविध पक्षांचे नेते या मैदानाचा वापर सभा गाजवण्यासाठी करतात. मात्र या ऐतिहासिक मैदानाच्या विकासासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला. सर्व सामान्य परिवारातील खेळाडू विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवण्याची धडपड करतात. ते आमखास मैदानावर  येऊन सराव करतात. मात्र मैदानातील अस्वच्छता,  कुठलीही जमीन जमीन लेव्हल नसणे आणि संपुर्ण मैदानात चिखल आणि साचलेले डाबके त्यावर उपाययोजना म्हणून राज्य वक्फ बोर्ड, तालुका क्रीडा अधिकारी, मनपा, जिल्हा व विभागीय आयुक्त प्रशासन काळजी घेताना दिसत नाहीऐ. परिणामी  मैदानातील चिखल व कचर्याच्या दुर्गंधीने खेळाडूंची डोकेदुखी वाढलेली आहे.  यासंदर्भात खेळाडू फुटबॉल अथवा क्रिकेटचा खेळ खेळत असताना त्यांचा चेंडू कचर्याच्या ढिगार्यात अथवा गाजरगवत आणि रानटी झुडपात अडकतो. खेळाडूंना चेंडू शोधूनही सापडत नाही. दरम्यान खेळाडू जीव धोक्यात टाकून चेंडू शोधण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान गवतात व रानटी झुडपात लपलेल्या चलचर प्राण्यांचा धोका असल्याने व मोठी इजा होण्याचा धोका असल्याचे पालक व खेळाडूंनी सांगितले. रात्री या मैदानाचा वापर ओपण मधूशाळा म्हणून केला जातो.‌ मद्याच्या बाटल्या फोडल्या जातात. दरम्यान दिवसा येथे विविध खेळ खेळणार्या खेळाडूंच्या पायात काट्यांसह काचा घुसुन जखमी होत असल्याचा साक्षीपुरावाच जखमी खेळाडूंनी टेंडरनामा प्रतिनिधीला पालकांसमवेत दाखवला. मैदानात सर्वत्र पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे व दुर्गंधीच्या नरक यातनेमुळे खेळाडूंच्याआरोग्याला धोका निर्माण झाला आहे.