Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबादेत संताप; रस्त्यांवरील पॅचवर्कच्या दर्जावरून खाबुगिरी उघड

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : पीडब्लुडी, एमएसआरडीसी, एनएचएआय, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि मनपा यांच्यासह जागतिक बँक प्रकल्पाच्या अखत्यारितील बेवारस उड्डाणपूल आणि खड्डेमय रस्त्यांबाबत 'टेंडरनामा'ने प्रहार केल्यानंतर पीडब्लुडी प्रशासनाकडून पॅचवर्कचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, भंगार पद्धतीने करण्यात येत असलेल्या पॅचवर्कने औरंगाबादेत संतापाची लाट उसळली आहे.

औरंगाबादेतील जालनारोडवर जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुल, सेव्हनहील, मोंढानाका, क्रांतीचौक, महावीर चौक व पीडब्लुडीच्या अखत्यारितील इतर मुख्य रस्त्यांवर पॅचवर्क करण्यासाठी जी-२० परिषदेनिमित्त शहरात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना खड्ड्यांचा त्रास नको म्हणून मनपाला ५० कोटी व पीडब्लुडीला १७ कोटी रूपये देण्यात आले होते. मनपाने मात्र अद्याप कुठेही रस्ते दुरूस्तीची कामे सुरू केली नाहीत. पीडब्लुडीने मात्र अखत्यारितील रस्ते, उड्डाणपुलावरील धावपट्टी, सेवा रस्त्यांची दुरूस्ती सुरू केली आहे. मात्र, होत असलेल्या येथील पॅचवर्क कामावर औरंगाबादेत मोठी संतापाची लाट पसरली आहे. काही सुजाण नागरिकांनी या पॅचवर्क कामावर देखरेख करणाऱ्या सहाय्यक अभियंत्यांना आणि काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरताना कानउघडणी केली. 'जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा' अशा शब्दात त्यांना फैलावर घेतल्याची घटना मोंढानाका येथे घडल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे पीडब्लुडीचे सहाय्यक अभियंते आणि कंत्राटदार प्रतिनिधींचा चेहरा पडलेल्या खड्ड्यापेक्षा अधिक पडलेला दिसून आला असल्याचे देखील येथील रिक्षाचालकांचा दावा आहे.

चला खड्डे पडलेले दाखवतो

'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे इत्यंभुत माहिती मिळाल्यानंतर प्रतिनिधीने होत असलेल्या कामाची पाहणी केली. त्यात पीडब्लुडी अंतर्गत कंत्राटदारांकडून पॅचवर्क करताना सुरु असलेली चिंधिगिरी पाहून अतिशय बिनडोकपणे मलमपट्टी केल्याचे समोर आले. प्रतिनिधी कॅमेऱ्यात छायाचित्र कैद करत असताना मार्गस्थांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. साहेब, फोटो 'त्या' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवा, बघा तूमच्या राज्यात कसे खडी आणि डांबर कोण खाते? या प्रश्नाचे उत्तर घ्या जरा त्यांच्याकडून, चला अजुन आमच्यासोबत आम्ही तुम्हाला अजुन कुठे कुठे खड्डे पडले ते दाखवतो, असे म्हणत औरंगाबादकरांनी पीडब्लुडीचे सहाय्यक अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगलेच वाभाडे काढले.

न्यायालयाचे आदेश तिजोरीत 'खड्डा'

गेल्या आठ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. रूपेश जैस्वाल यांनी औरंगाबादेतील खड्डेमय रस्त्यांबाबत वैयक्तिक जनहित याचिका दाखल केली आहे. दहा वर्षात औरंगाबाद मनपाहद्दीतील अनेकांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. अनेक महिला व पुरूष कायमचे अंथरूणावर खितपत पडलेले आहेत. न्यायालयीन आदेशाचा अवमान करणाऱ्या मनपा, पीडब्लूडी, एनएचएआय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागासह एमएसआरडीसी आणि पीडब्लुडी तसेच याच विभागांतर्गत काम करणाऱ्या जागतिक बँक प्रकल्पातील कारभाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारावर 'टेंडरनामा' सातत्याने वृत्त मालिका प्रसिद्ध केल्यानंतर पीडब्लुडीकडून पॅचवर्कचे कामी हाती घेण्यात आले आहे. मात्र, ते करताना त्यामध्ये कोणताही दर्जा नसल्याचे आज दाखवण्याची आम्ही दाखवून देत आहोत. आता न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पीडब्लुडीचे कारभारी निकृष्ट कामास कारणीभूत असलेल्या संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल करणार काय, त्याला काळ्या यादीत टाकणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा

पीडब्लुडीतील अधिकारी आणि कंत्राटदाराने जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवावी, यांच्या पाकिट संस्कृतीला कुठेतरी कोणीतरी आळा घालावा. कंत्राटदारांचे पाकिट घेऊन त्यांच्या ताटाखालचे मांजर झालेल्या काही अधिकाऱ्यांनी पीडब्लूडीची बदनाम केली आहे. ओरड झाल्यावर सिलकोट करू असे म्हणणारे अभियंत्यांची शैक्षणिक पात्रता तपासणे गरजेचे आहे. 

- डाॅ. सुयश सोनकांबळे 

खड्ड्यांमुळे औरंगाबादकरांची सगळीकडे नाचक्की

निम्मे शहर खड्ड्यात गेल्याने शहरातील वाहनांसह नागरिकांच्या हाडांचा खुळखुळा झाला आहे. खड्डा नेमका कोणता चुकवायचा आणि चुकवला तरी दुसऱ्या खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची डागडुजी नाही. त्यात विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी होत असलेले पॅचवर्क तरी चांगले व्हावे. पत्रकार साहेब औरंगाबादकरांचा हा जिव्हाळ्याचा रस्त्यांचा प्रश्न लावून धरला पाहिजे. 

- प्रकाशराव जिवरग, सेवानिवृत्त प्राचार्य