औरंगाबाद (Aurangabad) : राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीतून देशातील तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांचा विकास साधत असताना प्राचीन भगवान शंकराचे मंदिर व महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद - घृष्णेश्वर - एलोरा या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
गडकरी म्हणाले की, एकूण ६ किमी लांबीच्या या महामार्गामुळे जगप्रसिद्ध वेरुळ लेणी व अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर, तसेच मंदिरापासून जवळच असलेल्या वेरूळ - अजिंठा लेण्यांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.
ऐतिहासिक औरंगाबाद व अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे या महामार्गामुळे जोडली जातील. सदर महामार्गामुळे परिसरातील पर्यटन, शैक्षणिक, विशेष आर्थिक क्षेत्रांचा विकास होऊन हा ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते व दळणवळणांच्या साधनांच्या माध्यमातून देशातील आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्रांची महती जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मंत्री नितीन गडकरी म्हणाले.