Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : शिवाजीनगर भुयारी मार्ग आता मुल्यांकनाच्या कोंडीत

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील भुयारी मार्गासाठी २४ मीटर रूंद रस्त्यासाठी मौजे सातारा येथील गट नं. १२४/२ व १३१ मध्ये काही मालमत्तांचा अडसर ठरत आहे. या मालमत्तेत पत्र्याचे शेड, बांधकाम, विहिर आहे. या बाधित मालमत्तांचे मुक्यांकन करून मिळावे यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने मनपा प्रशासकांसह मनपातील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक तसेच मनपातील रस्ते व इमारतीच्या कार्यकारी अभियंत्याना चार महिन्यात पाचव्यांदा पत्रव्यवहार केला. एवढेच नव्हे, तर सातत्याने तोंडी व  स्मरणपत्रांचा मारा केला. मात्र, मनपा झोन कार्यालयांमध्ये मालमत्तांचे मुल्यांकन करणारी सक्षम यंत्रणा नसल्याचे म्हणत मनपातील कारभारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणी कोर्टात जनहित याचिका क्र. ९६/२०१३ अन्वये दाखल असल्याने भूसंपादनाचा निवाडा तातडीने करणे आवश्यक असल्याचा उल्लेख करत विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून देखील कार्यवाही होत नसल्याने मनपा अधिकारी न्यायालयीन प्रकरणात देखील गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या मुल्यांकनाच्या वादात मात्र औरंगाबादकरांची शिवाजीनगर रेल्वेगेटमधून कोंडी अद्याप फूटताना दिसत नाही. रेल्वेच्या ये-जा दरम्यान दररोजच कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

गारखेडा परिसरातील शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथे प्रलंबित भुयारी मार्गाचा गुंता सोडवण्यासाठी मौजे सातारा गट नंबर १२४/२ व १३१ मधील १७२८ चौरस मीटर क्षेत्र २४ मीटर रूंद रस्त्यासाठी संपादन करणे गरजेचे आहे. यातील गट नंबर १२४/२ पैकी काही जागेवर बांधकाम, पत्र्याचे शेड व विहीर तसेच गट नंबर १३१ मध्ये बांधकाम, पत्र्याचे शेड आहे.

कागदी घोडे नाचविण्यात अडकले मुल्यांकन

दोन्ही गटातील मालमत्तांचे मुल्यांकन करून मिळणेकरिता विशेष भूसंपादन अधिकारी वि.भा.दहे यांनी सर्वप्रथम मनपाचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव संधा यांना ८ ऑगस्ट २०२२ रोजी पत्र दिले. मात्र महिनाभर त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने २ सप्टेंबर २०२२ रोजी पून्हा स्मरणपत्रे दिले. मात्र, परिणाम शुन्य यानंतर त्यांनी मनपाचे नगररचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक ए. बी. देशमुख यांना कळवले. प्रकरणातील गांभीर्य ओळखून त्यांनी महिन्याभरानंतर अर्थात २ नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचा संदर्भ देत मुल्यांकनाबाबत कार्यकारी अभियंता संधा यांना पत्र दिले. मात्र, तरीही काही एक उपयोग झाला नाही. यावर नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी कार्यकारी अभियंता रस्ते आणि ड्रेनेज सेक्शनचे भागवत फड यांना १  डिसेंबर व ९ डिसेंबर २०२२ रोजी मुल्यांकनाबाबत पत्र दिले. मात्र संबंधित विभागांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर विशेष भूसंपादन अधिकारी दहे यांनी मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना तिसरे स्मरणपत्र असा उल्लेख करत संबंधित जागेवरील मालमत्तांचे मुल्यांकन करून देण्याबाबत विनंती केली. मात्र प्रशासन प्रमुखांकडून देखील कार्यवाही झाली नाही. केवळ चार महिने कागदी घोडे नाचवत मुल्यांकनाच्या कार्यवाहीत मनपा कारभाऱ्यांनी चालढकल केली.

असा झाला टेंडरनामा वृत्त मालिकेचा परिणाम

● गेल्या दोन दशकापासून रखडलेल्या शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील भूयारी मार्गाच्या रखडलेल्या प्रश्नावर टेंडरनामाने वृत्तमालिका प्रकाशित करताच पीडब्लुडीचे मुख्यअभियंता दिलीप उकिर्डे यांनी प्रादेशिक कार्यालयात ९ फेब्रुवारी २०२२ रोजी बैठक बोलावली होती.

● तत्कालिन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच विद्यमान जिल्हाधिकारी यांनी जलदगतीने मनपाकडून सुधारित प्रस्ताव मागत भूसंपादनाची मंजूरी दिली.

● या बैठकीत आठ दिवसात मनपाच्या खात्यात भुसंपादनासाठी ३० टक्के रक्कम वर्ग करण्यात येईल असेही सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सरकारकडे वेळोवेळी पाठपूरावा करून एक कोटी ८१ लाख ३१ हजाराचा निधी मनपाच्या तिजोरीत टाकला.

● याप्रकरणी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी औरंगाबादच्या भूमिअभिलेख कार्यालयामार्फत रस्ता रूंदीकरण प्रक्रियेत बाधित जागेची संयुक्त मोजणी देखील झालेली आहे.

● मोजणी नकाशा व भूसंपादन कायद्यातील परिशिष्ट-१६ विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयामार्फत मनपातील सहाय्यक संचालक , नगर रचना विभागाला देण्यात आली. 

● मौजे सातारा येथील गट नंबर १२४/२ व १३१ मधील अस्तित्वातील रस्त्याच्या २४ मीटर रूंदीकरण शिवाजीनगर रेल्वेगेट भूयारी मार्गासाठी भूसंपादन प्रकरणी नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कलम ११ नुसार ३० जून २०२२ रोजी शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रकाशित झाली आहे.