Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकल्या खऱ्या; पण खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)  : तीन वर्षांपासून अमृत योजनेच्या नावाखाली शहरभर रस्त्यांचे खोदकाम करून छत्रपती संभाजीनगरकरांची कसोटी आणखी बिकट झाली आहे. एकाच रस्त्यावर तीन-चार वेळा जेसीबी, पोकलॅंडने रस्ते खोदले जात आहेत. काम झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत दुरुस्ती मात्र कोणत्याही रस्त्यांची केली जात नाही.

केवळ जलवाहिनीसाठी खोदलेली माती, मुरूम व दगडांची भरती करून जलवाहिनी दाबली जात आहे. त्यावरही मातीचे डोंगर रचले जात असल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या नरकयातना अजून, किती दिवस सहन करायच्या? असा प्रश्‍न संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतो आहे.

अमृत योजनेंतर्गत रस्ते खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षांपासून शहरात सुरू आहे. या काळात शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्ते तसेच नागरी वस्त्यांमधील जवळपास ७० ते ८० टक्के रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. कोणतेही नियोजन न करता हे खोदकाम झाले असून, ‘अमृत’च्या करारात तरतूद असूनही मक्तेदार या खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करायला तयार नाही. 

सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील ‘अमृत’ अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांचे दुर्दैव असे की सुरवातीला उजव्या बाजूने रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यानंतर डाव्या बाजूने रस्ते खोदले जात आहेत. त्यात जलवाहिनी टाकली जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात जलवाहिन्या बुजवण्यात आल्या आहेत. नंतर रस्त्यांच्या डाव्या बाजूने खोदकाम केले जात आहे, जलवाहिनी टाकून चारी कशीबशी बुजवली जात आहे.

चांगली दुरुस्ती कोणत्याही रस्त्यांची केली जात नाही. प्रमुख रस्त्यांना मिळणारे उप रस्तेही अगदी मधोमध खोदून ठेवलेय. अनेकांची नळजोडणी तुटली, त्यांना सध्या पाणीही मिळत नाही. अनेक ठिकाणी मलनिःसारण वाहिनी फोडल्याने त्यांच्या दुरूस्तीचे कामही केले जात नाही. त्यामुळे जलवाहिनीचे काम कधी पूर्ण होणार आणि कधी खड्ड्यातून नागरिकांची सुटका होणार, यावर कुणी बोलायला तयार नाही.

महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही प्रशासनांनी ‘अमृत’च्या कामावर  मॉनिटर करणे अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणा त्यापासून अगदी अलिप्त आहेत. अधिकाऱ्यांना विचारले तर ते कंत्राटदाराचे काम आहे,असे सांगितले जाते. कंत्राटदार समोर येतच नाही. जे काम करतात, त्या लोकांना विचारले, तर आम्हाला एवढेच काम करायचेय, असे सांगितले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेमके या प्रकरणात काय करतेय, हे कुणालाही माहीत नाही. या स्थितीत छत्रपती संभाजीनगरकरांच्या नरकयातना कमी व्हायला तयार नाहीत.