Tendernama
Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरात अनेकांचे जीव घेणारे 'ते' खड्डे अजूनही तसेच कसे?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर सारख्या विभागीय मुख्यालय व जागतिक पर्यटन महानगरी असलेल्या या शहरातील माणसांचा जीव हा किड्या-मुंग्यासारखा झाला आहे. इथं लोक मेले तरी त्याचं कुणाला सोयरं सुतक नसतं. त्यात सरकारी अधिकारी तर मेलेल्या टाळूचं लोणी खायला ही तयार असतात. असेच प्रकार घडतात जालना रोडवरील सेव्हन हिल, क्रांतीचौक उड्डाणपुलावर, एपीआय क्वार्नर ते प्रोझोन माॅल फुटपाथ, जीएसटी कार्यालय ते अग्रसेन चौक फुटपाथ, सुतगिरणी चौक या ठिकाणी.

खड्ड्यांनी घेतला अनेकांचा बळी

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्ते, फुटपाथ यावर सातत्याने मलनिःसारण व जलवाहिनी तसेच केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जाते. यासंदर्भात टेंडरनामा सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली.‌ या खड्यांमुळे अनेकांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.‌ ही बातमी पुन्हा सांगण्याचं कारण असं की, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व एमएस आरडीसी तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कदाचित हे मृत्यू किरकोळ वाटतात. अजून काही निष्पाप जणांचा जीव गेल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. काहींना अपंगत्व आल्याशिवाय त्यांचे समाधान होणार नाही.‌

सेव्हन हिल्स उड्डाणपुलाबाबत टेंडरनामाने सातत्याने आवाज उठवला.‌ पीडब्लूडीच्या  अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर २३ दिवसांपूर्वी एका तरूणीच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन ती गंभीर जखमी झाली नसती. रुग्णालयाचा खर्च तिला ओढवला नसता, असं येथील नागरिकांचे म्हणणं आहे. इतकं सगळं झालं असताना महानगरपालिका, पीडब्लूडी, एमएसआरडीसी, एमआयडीसीचे अधिकारी मात्र छत्रपती संभाजीनगरकरांच्या तक्रारीला भिक ही घालत नाहीत. इतकचं काय तर सबंधित विभागांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून देखील, रस्ते, फुटपाथ यांची सद्य:स्थिती तपासली जात नाही.‌ कामं करायची जबाबदारी असणाऱ्यांना ही कामं करायची नाहीत, अशी तंबीच वरिष्ठांकडून देण्यात आली आहे का, असा संशयच बळावत आहे.

त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांची किती काळजी आहे, हे यावरून स्पष्ट होतं. विशेष म्हणजे शहरातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत, पण सत्ताधाऱ्यांचा आणि वरिष्ठांचा कुठलाही अंकुश नसलेले अधिकारी मात्र अजूनही आपल्याच गुर्मित आहेत. त्यांची गूर्मी उतरण्यासाठी कदाचित अजून काही जणांचे बळी जावे लागतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली आहे.

अवकाळी पावसाचे ढग आकाशात दिसू लागले. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यात नवीन पाणीपुरवठासाठी खोदलेले शहरातील सर्वच रस्ते तकलादू बनल्याने रस्ते खचू लागलेत. चार दिवसांपूर्वीच शहरातील गारखेडा भागात विश्रांतीनगरात महानगरपालिकेचे पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे एक टॅंकर पलटी झाले. लोकांच्या तोंडातले पाणी रस्त्यावर वाहिले. दुसरीकडे टॅंकर दुरूस्तीसाठी महानगरपालिकेला मोठा खर्च करावा लागला.

नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत गोपाल स्वीट भांडार ते शिवाजीनगर या नव्या सिमेंट रस्त्याचे खोदकाम करून जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने खोदकाम करून जलवाहिनी टाकली. पण खोदकामातील माती मुरुम टाकून थातूरमातूर पध्दतीने नाली बुजवली. त्याच नालीतून टॅंकर जात असताना ते पलटी झाले.

जीव्हीपीआर कंपनीने शहरातील प्रत्येक रस्त्यांवर अशीच धोकादायक स्थिती करून ठेवलेली आहे. हे रस्ते अवकाळी पाण्यात पुन्हा खचण्याची दाट शक्यता आहे. किमान पाऊस सुरू होण्यापूर्वी तरी मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी अपघातांची गंभीर दखल घेऊन इतरांचे जीव वाचवावे अशी साधी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. जीएसटी कार्यालय ते अग्रसेन चौक

दरम्यान, एपीआय क्वार्नर ते प्रोझोन माॅल, लक्ष्मण चावडी ते नुतन काॅलनी, सुतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर, कॅनाॅट गार्डन परिसरातील रस्ते, फुटपाथवर अनेक प्राणघातक खड्डे आहेत.‌ विशेषतः जीएसटी कार्यालय ते अग्रसेन चौक मार्गावर शिवजयंतीच्या दिवशी रात्री पोलिसांचे वाहन फुटपाथमधील चेंबरमध्ये अडकले होते. तरीही त्यावर अद्याप ढापे टाकले नाहीत.‌ शहरात जलवाहिनी, मलनिःसारण वाहिनी व केबल टाकण्यासाठी रस्ते आरपार खोदले जातात. पण रस्ते पूर्ववत केले जात नाहीत. ब्रीजवाडीत गेल्या दोन महिन्यांपूर्वी उघड्या नालीत पडून एका चिमुकलीचा बळी गेला. अद्याप नाली उघडीच आहे.