Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराने चक्क मनपाचा रस्ताच खोदला

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : बीड बायपास परिसरातील हाॅटेल निशांतपार्क समोरील मनपाच्या मालकीहक्कातील सार्वजनिक जोडरस्ता खोदण्यात आला. या भागातील नागरिकांच्या असंख्य तक्रारीनंतर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने स्पाॅटव्हिजीट केली. संग्रामनगर उड्डाणपुलाखाली भरती करताना मुरुमाची कमतरता भासल्याने ठेकेदाराने चक्क बीड बायपासच्या शेजारीच असलेला जोड रस्ता वीस ते बावीस फुट खोदण्यात आल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.

१४ डिसेंबर २०२२ रोजी ठेकेदार जीएनआय मनजीत जाॅईंट व्हेंचर कंपनीने येथे खोदकाम चालू करताच रस्त्यालगत असलेल्या निशांतपार्क हाॅटेल चालकाने वाद घातल्याने हाॅटेलसमोरील खोदकाम थांबवले. मात्र तेवढे अंतर सोडून ठेकेदाराने तीन ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने येथे तीन ठिकाणी रस्ता मौत का कुऑ बनला आहे. दरम्यान संग्रामनगर पुलाचे काम झाल्यावर पंधरा दिवसात रस्त्यात भरती करण्यात येईल, रस्त्याचे काम करण्यात येईल, असे ठेकेदाराने येथील नागरिकांना सांगितले होते. पण तेथील पुलाचे काम होऊन चार महिन्यांपासून ना रस्त्याचे काम झाले, ना खड्डे बुजवले.

दरम्यान येथील खड्ड्यात एक इसम पडल्याचे व एक दुचाकी पडता पडता वाचल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने एमआयडीसीकडे विचारणा केली असता आमच्या पाइपलाइनचे काम झालेले आहे. तेथील खड्डे जीएनआय मनजीत जाॅईंट व्हेचरने केल्याचे सहाय्यक अभियंता प्रशांत सरग यांनी सांगितले.

हे महाकाय खड्ड्यांची खोली आणि लांबी रुंदी अधीक असल्याने बीड बायपास परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे एकापाठोपाठ असे तीन खड्डे नव्हेतर हे जीवघेणी भगदाडे आहेत. ज्यात कोणी पडल्यास तो जागीच मृत्युमुखी पडेल, एखादा वाहनधारक त्यात पडल्यास त्याचा आवाज देखील कुणाला ऐकू येणार नाही. आधीच अत्यंत निकृष्ट आणि हलगर्जीपणाने बीड बायपासचे काम सुरू आहे. त्यामुळे बीड बायपासकरांना मनपाच्या हद्दीतील या जोड रस्त्याचा दिलासा आहे. मात्र खड्डे केल्याने संग्रामनगर ते एमआयटीकडे ये-जा करताना हजारो वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

देवानगरी ते संग्रामनगर पुलादरम्यान ठेकेदाराने मनपाच्या परवानगी विना रस्त्याचे खोदकाम केले. त्यात यावर टेंडरनामाने वृत्त प्रकाशित करताच मनपा प्रशासक तथा आयुक्तांनी त्याला ५० लाखाचा दंड आणि रस्ता सुधारण्याचे आदेश दिले. झालेला दंड मनपाचे रस्ते खोदून त्यातील मुरूमचोरीतून वसूल करण्याचा उद्योग ठेकेदाराने केला काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

हे खड्डे तातडीने बुजवावेत मनपा प्रशासनाने या रस्त्याचे खोदकाम करताना कुणाची परवानगी घेतली होती काय? विशेष म्हणजे थेट जोड रस्ता खोदून ठेकेदाराने त्यातील मुरूम इतरत्र वाहतूक केला आहे. यास जिल्हा गौणखनिज अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी होती काय? याची देखील विभागीय चौकशी नेमून चौकशी करण्यात यावी, अशी देखील मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बीड बायपासला परिसरातील नागरिकांसह सातारा - देवळाई येथील नागरिकांसाठी येण्या- जाण्यासाठी पर्यायी जोडरस्ता नाही. बायपासचे काम करण्यापूर्वी या मार्गावरील हजारो अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. मात्र जोडरस्ता गुलदस्त्यातच राहीला. केवळ संग्रामनगर जबिंदा मैदानाच्या बाजुने एमआयटीपर्यंत परिसरातील नागरिकांना येण्या - जाण्यासाठी तुटक -  तुटक असलेल्या या जोड रस्त्याचा वापर केला जातो. त्याच्या बाजूला रेल्वे रुळापर्यंत किमान दोन ते तीन हजार घरांच्या मोठ्या दाट वसाहती आहेत. शाळा - महाविद्यालये, हाॅटेल्स, कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने आहेत.

गत दीड ते दोन वर्षापासून रस्त्याचे निकृष्ट आणि आयआरसीच्या मानकांना डावलून काम सुरू आहे. याआधी 'राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग - बीड बायपास' ही ओळख तीनशे कोटी खर्च करूनही पुसली गेली नाही. रस्त्याच्या कामा दरम्यान दोन तरुणांचा बळी आणि अनेक अपघातात जखमी झाले. असे असताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा पाहून याला कुणाचा छुपा आशिर्वाद आहे, असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.

थेट मनपाचा जोडरस्ता उकरून त्यातील मुरुम लगतच्याच राष्ट्रीय महामार्गासाठी वापरण्यात आला. गल्लीत मोठी ड्रेनेजलाइन टाकण्यात आली. त्यासाठी नंतर हा रस्ता दुरुस्त तर केलाच नाही. चक्क चार महिन्यापासून खड्डे तसेच ठेवले आहेत. आकाशात अवकाळी पावसाची मेघगर्जना सुरू असताना खड्डे बुजवले जात नाहीत. आधीच रस्त्यात घाण व अवकाळी पावसाने चिखल साचला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

पावसामुळे खड्ड्याचा धोका अधीक वाढला आहे. या शहरात एक विरोधी पक्ष नेता, दोन केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यमंत्री असताना रोजच या मार्गाने त्यांचा ताफा जात येत असतो. मग हे महाभयंकर जीवघेणे खड्डे 'टेंडरनामा'च्याच नजरेस का पडतात, यावरून जनतेप्रती लोकप्रतिनिधींचा कर्तव्यशून्य कारभार समोर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.