Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

'या' कारणांमुळे रखडले सिडकोतील विठ्ठलनगर जलकुंभाचे काम

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेतून बांधण्यात येणाऱ्या विठ्ठलनगर जलकुंभाचे बांधकाम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. येथील बांधकामावर किमान १५ मजुरांची आवश्यकता असताना केवळ सात मजुरांवर धकवले जात आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा देखील पुरवठा केला जात नाही. धक्कादायक म्हणजे मजुरांना तुटपुंजी मजुरी दिली जात आहे. ती मजुरी देखील वेळेवर मिळत नसल्याने एकूणच येथील बांधकामाचा स्पाॅट पंचनामा केला असता, हे बांधकाम कधी पूर्ण होणार आणि या भागाला सुरळीत पाणीपुरवठा कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराचा कायमचा पाणी समस्येचा प्रश्न मिटण्यासाठी जायकवाडी धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना २०१९ मध्ये मंजूर झाली. या योजनेअंतर्गत शहरातील महानगरपालिकेच्या वतीने टाकलेल्या सर्वच जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहे. जुन्या जलकुंभांची कालमर्यादा संपल्याने विविध प्रभागातील सार्वजनिक जागेवर जास्त साठवणूक क्षमतेचे जलकुंभाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र याच योजनेअंतर्गत विठ्ठलनगर येथील जलकुंभाचे बांधकाम गत दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.

प्राप्त तक्रारीनुसार प्रतिनिधीने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास जलकुंभाची पाहणी केली. दरम्यान तेथे माहिती देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अथवा जीव्हीपीआरचा क्षेत्रीय अभियंता देखील उपस्थित नव्हता. विशेषतः येथे बांधकामाचा तपशिल सांगणारा फलक लावण्याची देखील ठेकेदाराने तसदी घेतल्याचे दिसून येत नाही. येथील बांधकामाबाबत मजुरांना थेट प्रश्न करावे लागले. जमीनस्तरावरचे ६४ आडवे बीम आणि त्यावर ३७ उभे काॅलमचा पहिला टप्पा पुर्ण केला आहे. त्यावरच्या दुसऱ्या टप्प्यातील आडवे उभ्या बीमचे काम सुरू करण्यात आले आहे.

गत दोन वर्षांपासून हे बांधकाम कासवगतीने का सुरू आहे, असा सवाल येथील मजुरांना उपस्थित करताच त्यांनी या मोठ्या कामावर किमान १५ ते २० मजुरांची आवश्यकता आहे तिथे केवळ ७ कर्मचारी काम करत आहेत. येथील बिगारी काम करणाऱ्याला चारशे रुपये तर मिस्तरीला पाचशे रुपये हजेरी मिळते. मजुरी देखील वेळेवर मिळत नाही. कमी वेतनात इतक्या दुरवरून येथे काम करणे परवडत नाही. ठेकेदार दर रविवारी जेवनासाठी एक हजार रुपये देतो. पण हजार रुपयात नाष्ट्याची देखील सोय होत नाही. परिणामी मिस्तरी आणि बिगारी येथे काम करण्यास नकार देत आहेत.

चार दिवसापासून येथे स्टील, बाईडींग वायर , सिकंजा, बाॅटमपट्ट्या, हातोडा नव्हता. खूप पाठपुरावा केला तर बांधकाम साहित्य मिळते. परिणामी काम अर्धवट स्थितीत पडून राहते. येथील मजुरांच्या तोंडून अशी उत्तरे मिळाल्यानंतर या जलकुंभाचे बांधकाम पूर्ण केव्हा होईल आणि याद्वारे रामनगर, विठ्ठलनगर, तानाजीनगर, प्रकाशनगर, म्हाडा काॅलनी, मुर्तीजापूर, पुष्पकनगर, चिकलठाणा या भागात पाणीपुरवठा केव्हा सुरळीत सुरू होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जीवन प्राधिकरण विभाग आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कासवगती कारभारावर लक्ष देऊन शहराला नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सदर योजनेचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा

सद्य:स्थितीत एकीकडे जलकुंभाचेच काम रखडलेले आहे. जीव्हीपीआर कंपनीने या भागात जुन्या जलवाहिनी शेजारीच नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान जेसीबीने खोदकाम करताना जुनी जलवाहिनी अनेक ठिकाणी फोडल्याने गत अकरा दिवसापासून या भागात निर्जळी आहे. फुटलेली जलवाहिनी जोडण्यासाठी जीव्हीपीआरच्या विभागीय अभियंता गुप्ता यांना तीन दिवसापासून आम्ही फोन करतोय. हा अभियंता फोन देखील घेत नाही. खोदकाम करताना जुन्या जलवाहिनीवरचे व्हाॅल्व देखील पळवले जात आहेत. मुळात या बड्या कंपन्याचे अधिकारी चोर आहेत का, असा सवाल केल्यावर कंपनीने काम सुरू केले. रखडलेल्या जलकुंभाच्या कामाबाबत मी वार्डातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा मनोज बन्सीलाल गांगवे यांनी दिला.