Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : रिलायन्स जिओ इन्फोकाॅमचा हलगर्जीपणा; बघा काय केले?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना महामार्गाचे G २० च्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले. यापूर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने साईड पट्ट्यात ७४ कोटी खर्च करून स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा उभारली. लगतच साडेतीन मीटरचा फुटपाथ केला. या कामाला पूर्ण करून काही महिने होत नाही तोच आता ओएफसी कंपनीच्या केबल नेटवर्किंगच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे.

त्‍यामुळे ऐन अवकाळी पावसाळ्यात रस्‍ता खचून वाहनांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खोदकामामुळे वाहनांना मार्ग काढण्यात अडथळा येत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

अपघात टाळण्यासाठी मार्गावर साईडपट्टी आवश्‍यक आहे. परंतु या महामार्गावरील भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. यात साईडपट्टीही उखडली असून, मोठी नाली तयार झाली आहे. माती रस्‍त्‍यावर पसरली आहे. तर काही ठिकाणी रस्‍त्‍यालगत मातीचे ढिगारे केल्‍याने माती निम्‍म्‍या रस्‍त्‍यावर आली आहे. यातून वाहतूक करताना विशेषतः दुचाकीस्‍वारांना चांगलीच कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील माती खडीचे ढीग आणि उखरलेली नाली दिसून येत नसल्याने मोठ्या वाहनांचेही अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे लवकरात लवकर खोदकाम केलेली साईडपट्टी पूर्ववत करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

पावसाळ्यात धोका

साईडपट्टी तयार करताना रस्‍त्‍यालगत माती भराव करून त्यावर मुबलक पाणी मारून रोलरच्या साह्याने मजबूत केली गेल्यास वाहने तेथे उभी राहू शकतात. परंतु येथील‌ साईडपट्टी भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदून पूर्ववत न केल्‍याने पावसाळ्यात त्यावर वाहने उभी राहिल्यास माती खचण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्याने माती वाहून गेल्‍यास रस्‍ताही खचू शकतो.

रिलायन्स जिओ इन्फोकाॅम लि. कंपनीला संपूर्ण शहरातील ६८६९७ मी. खोदण्यास परवानगी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी दिली आहे. सदर कंपनीकडून शहरातील ११८ प्रभागातील ९ झोनमधील विविध वार्डात महाआयटी प्रकल्पांतर्गत सरकारी व खाजगी कार्यालयांच्या कनेक्टिव्हिटीसाठी शहरात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करत आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावरील अपना बाजार ते आकाशवाणी दरम्यान डाव्या साईडची साईडपट्टी कंपनीने खोदून काढली आहे. मात्र गत महिन्याभरापासून केबल टाकून नाली तशीच ठेवण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी जीव्हीपीआरने खोदकाम करून खड्डे तसेच ठेवले. आता रिलायन्स जिओ इन्फोकाॅम लि. कंपनीने खोदकाम केले आहे.

दरम्यान मातीचे ढिगारे रस्त्यावर पसरलेले आहेत. त्यासाठी खड्डा केला, माती रस्त्यावर सोडून कंपनी निघून गेली. या माती आणि उघड्या नालीजवळ रिफ्लेक्टर रिबीन, बॅरिकेट्स उभारलेले नाहीत. सुरक्षारक्षक तैनात केले नाहीत. रेडियम पट्टे मारले नाहीत. त्यामुळे डाव्या बाजूने जाताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.