मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ४२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गातील ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत दिली.
याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे यांनीही उपप्रश्न विचारले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, या रस्त्याचे काम सलग न झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) रस्त्याखालील पाईपलाईनचे काम हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे काही अडथळे निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाईपलाईनचे काम पूर्ण होईल.
सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर बोर्ड आदी लवकरच बसवण्याच्या सूचना ‘एनएचआय’ला देण्यात येतील. तसेच छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
रस्त्यासाठी ७९७ झाडे वाचवण्यात यश आले आहे, रस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आला आहे. एकूण २०० कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम असून, भू-संपादनाची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर सुरू असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
दौलताबाद टी पॉइंटच्या टेंडरबाबत भोसले म्हणाले, ५ मार्च २०२४ रोजी टेंडर सूचना काढण्यात आली होती. उच्च न्यायालयात यासंदर्भातील निकाल लागून टेंडर स्वीकृतीची प्रक्रिया २३ जून २०२५ रोजी पूर्ण झाली आहे. येत्या सात दिवसांत कार्यारंभाचे आदेश देण्यात येतील.