Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

मनपा शाळांतील 15000 विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : स्मार्ट सिटी अंतर्गत घेतलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे मनपा शाळांतील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी मनपा शाळांतील शिकणाऱ्या मुलांना उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळावे यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांतर्गत मनपाच्या 50 शाळांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान आणि सहायक प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे व मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या देखरेखीखाली कार्य करत आहेत.

या प्रकल्पात शाळेतील गरजेची बांधकाम दुरुस्ती करण्यात येत आहे. यामध्ये वॉटरप्रूफिंग, उन्हाळ्यात वर्ग तापले जाऊ नये म्हणून छतावर इंसुलेटेड पफ पैनल बसवणे, ग्रिल, दरवाजे आणि सलाईडींग खिडक्या बसवणे, वर्गाना आतून आणि बाहेरून रंगवणे यांचा समावेश आहे. बांधकाम दुरुस्तीच्या कामासाठी स्मार्ट सिटीकडून 29 कोटी रुपयांचे टेंडर अंतिम करण्यात आले होते आणि हा प्रकल्प विक्रम इन्फ्राटेककडून करून घेण्यात येत आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार औरंगाबाद मनपाच्या शाळांना डिजिटल करण्यात येत आहे. यासाठी स्मार्ट सिटीकडून या प्रकल्पातील शाळांमध्ये प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड, व्हाइट बोर्ड, विज्वलायझर कम्प्युटर, स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक शाळेत स्कॅनर व झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांना डिजिटल करण्यासाठी स्मार्ट सिटीकडून 26 कोटींचे टेंडर अंतिम करण्यात आले होते आणि हा प्रकल्प स्टार एंटरप्राईजेस पूर्ण करत आहे, असे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान म्हणाले. ते म्हणाले की वर्ष अखेरपर्यंत सर्व शाळा सुसज्ज होतील. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक साठी डेस्क आणि आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी स्मार्ट सिटी कडून 6 कोटींचे टेंडर अंतिम करण्यात आले होते आणि समता इंटेरियरसकडून हे कार्य करून घेण्यात येत आहे. यामुळे मनपा शाळांतील शिकणाऱ्या सादे घरातून येणाऱ्या मुला मुलीना आधुनिक शालांसारख्या सुविधा मिळणार आहे, असे मनपाचे शिक्षण अधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले.