Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

बीड बायपास : 'त्या' ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची पोलखोल करताच लिपापोतीला सुरवात

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatाapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा ते आडगाव फाटा ते कॅम्ब्रिज नाका पर्यंत होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाची 'टेंडरनामा'ने पोलखोल करताच रस्त्यावरील सिमेंटीकरणाचा खराब झालेला सरफेस पुन्हा एकदा काढून दुरूस्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या संपुर्ण १९ किलोमीटर रस्त्याचे काम या भ्रष्टाचारी ठेकेदाराने निकृष्ट केलेले आहे. त्यामुळे आकाशच फाटलेले असताना हा भ्रष्टाचारी ठेकेदार ठिगळे कुठे कुठे लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'टेंडरनामा'ने सचित्र वृत्तमालिका प्रकाशित करताच रस्त्याच्या या निकृष्ट कामाबाबत सातारा, देवळाईसह बीडबायपास व छत्रपती संभाजीनगरात एकच चर्चा होत आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर कंत्राटदाराने लिपापोती सुरू केली आहे.

निकृष्ट आणि संथगती कारभार

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ बीड बायपासचे पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा ते आडगाव फाटा - झाल्टा फाटा ते कॅम्ब्रिज चौकपर्यंत सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण, दुभाजक, जोड रस्त्याचे व उड्डाणपुलांसह गटार बांधण्याचे व छोट्या पुलांचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने व अत्यंत निकृष्टपणे होत असल्याचे चित्र 'टेंडरनामा'च्या पाहणीत सातत्याने समोर आले आहे.

राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग

देवळाई चौक, संग्रामनगर, एमआयटी चौक उड्डाणपुलांची उंची कमी झाल्याची चालबाजी  लक्षात आल्यावर कारभाऱ्यांनी भुयारी मार्गासाठी खोदकाम करून रस्ते खड्ड्यात घातले. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुभाजकाची उंची वाढवल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. दरम्यान संग्रामनगर उड्डाणपुलाच्या उतारावरील दुभाजकाला धडकून एका पाठोपाठ एक अपघात होऊन दोन तरुणांचे बळी गेले. रस्त्याचे काम हलगर्जीपणाने चालू असताना देखील चार बळी गेले. अनेकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले.

आकाशच फाटले, ठिगळ कुठे कुठे लावणार

यातच सिमेंट रस्त्याच्या कामातील फोलपणा व भ्रष्टाचारी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाच्या नमुना 'टेंडरनामा'ने पोलखोल करताच. रस्त्याला मोठे तडे गेल्याचा पृष्ठभाग ओरबाडून आता तेथे नव्याने काॅंक्रिटीकरण करण्याचा प्रताप या भ्रष्टाचारी ठेकेदाराकडून केला जात आहे. तर काही ठिकाणी डांबर भरण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पण या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी आरपार तडे गेले आहेत. मायनर आणि मेजर क्रॅक पडलेले आहेत. रस्त्याच्या कडांना भुंगा लागलेला आहे. खडी उखडून खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. थातुरमातूर होत असलेल्या या कामाबाबत 'टेंडरनामा'ने आवाज उठविला. तसेच होत असलेल्या कामांची चित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामध्ये रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, हे सर्वांना दिसून आले.

खा. जलील करणार केंद्राकडे मागणी

या सर्व प्रकाराबाबतची माहिती खा. इम्तियाज जलील यांना प्रतिनिधीने दिली. यासंदर्भात केंद्र व राज्य तसेच स्थानिक दक्षता व गुणनियंत्रण पथकासोबत रस्त्याची पाहणी करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचारी ठेकेदारापुढे कोणाचे चालेना

यापुर्वी आमदार संजय शिरसाट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विद्यमान जिल्हाधिकारी आस्तीकुमार पाण्डेय, तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पालकमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अतुल सावे यांनी या भ्रष्टाचारी ठेकेदाराला बीड बायपासच्या निकृष्ट कामाबाबत खडे बोल सुनावले होते. मात्र त्याला याचा काही फरक पडला नाही. 

वसाहतींना पाण्याचा विळखा

दरम्यान, रस्ता शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असून, रहदारीसाठी नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच या सिमेंट रस्त्याची उंची वाढवल्याने पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या वसाहतीत सर्वांत जास्त पाणी साचत आहे. त्यामुळे शहरातील सर्वांत जास्त पाणी साचणारा हाच मुख्य रस्ता अशी ओळख या रस्त्याने निर्माण केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे संबंधित ठेकेदार, पीडब्लूडीतील जागतिक बॅंक प्रकल्पाचे प्रशासन साफ दुर्लक्ष करीत असल्याचे एकंदरीत चित्र या घटनेवरून उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

२९२ कोटीचे काम

शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीस पर्याय म्हणून बनविलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळला होता. केंद्र व राज्य सरकारने अनेक पर्याय शोधले पण त्यासाठी निधीची उपलब्धतता होत नव्हती. हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

इस्टिमेट तयार केले गेले. त्यातअंतर्गत २९२ कोटी तून होणाऱ्या या रस्त्यावर तीन  उड्डाणपूल बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे करोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावली असताना बीड बायपासच्या कामाला सरकारने निधीचा अडथळा येऊ दिला नाही. टेंडर प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले आहे.

यंत्रणेला नव्याने काम करण्यास भाग पाडले

शहराच्या  दक्षिणेकडे सुरू असलेल्या या कामाकडे शहरवासीयांचे चांगलेच लक्ष आहे. मात्र, इतकी मोठी रक्कम खर्च करूनही कामाचा दर्जा राखला जात नसेल, तर याला काय म्हणावे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगत आहे. टेंडरनामाच्या जागरूक आणि निर्भिड पत्रकारीतेने  रस्त्याच्या होणाऱ्या निकृष्ट कामाबद्दल आवाज उठवला व काम पुन्हा एकदा करण्यास यंत्रणेला भाग पाडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून टेंडरनामाचे कौतुक होत आहे.