Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबादकरांचा संताप; व्हर्टिकल गार्डनआधी रस्त्यातील खड्डे बुजवा

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावर जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाची धावपट्टी आणि जोड रस्ते खड्ड्यात गेले आहेत. एमएसआरडी आणि ठेकेदार कंपनीचा ताळमेळ बसत नसल्याच्या वादात येथील खड्ड्याची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने या ठिकाणी वाहनचालकांना खड्डे आणि धुळीमुळे जीवघेण्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येथील खड्ड्यांची दुरुस्ती न करता रेंगाळलेल्या या कामावरच उड्डाणपुलाच्या भिंतीवर मनपाने व्हर्टिकल गार्डन सजवल्याचा हा प्रकार पाहून औरंगाबादकर संताप व्यक्त करत आहेत.

यासंदर्भात समाजसेवक राहुल इंगळे यांनी मनपा आणि एमएसआरडीसीकडे तक्रार देखील दाखल केली आहे. आधी शहरातील खड्डे बुजवा, नाल्यांची सफाई करा; मगच असे व्हर्टीकल गार्डन तयार करा, अशी त्यांची मागणी आहे.

औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावर जळगाव टी पाॅईंट येथे उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले. मुंबईच्या रंजन मिश्रा यांच्या जे. एम. सी. प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर २० जून २०१६ रोजी त्यांनी हे काम पूर्ण केले होते. एकूण १११३ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलात ६८० मीटर लांबीचे गाळे, ३२५ मीटर लांबीचे जोडरस्ते, १७.२० मीटरची चारपदरी धावपट्टी अशा बांधकामात हा पूल साकार करण्यात आला आहे. यापुलाच्या बांधकामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट समिती म्हणून श्रीखंडे कंन्सलटंट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. पुलाच्या बांधकामासाठी ५६ कोटी २५ लाखाचा खर्च करण्यात आला आहे.

मुकुंदवाडीकडून हाॅटेल रामगिरीपर्यंत उड्डाणपुलाची धावपट्टी आणि ॲप्रोच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. मात्र, या खंड्ड्यांच्या दुरुस्तीकडे एमएसआरडीसीतील मुख्य अभियंता बी. डी. साळुंखे, अधीक्षक तथा कार्यकारी अभियंता सुरेश अभंग आणि उप अभियंता या अधिकाऱ्यांसह यापूर्वीच्या अभियंत्यांनी डागडुजीच्या कामाकडे कधीही लक्ष दिले नाही. ठेकेदार रंजन मिश्रा याच्या जे.एम.सी.प्रोजेक्ट इंडिया प्रा.लि.कंपनीला आर्थिक फायदा पोहोचविण्यासाठी दोष निवारण कालावधीत देखील रस्त्याचे काम केले नाही.

नियमानुसार ठेकेदाराने काम केल्यावर उपयोगिता प्रमाणपत्र मिळाल्यावर दर तीन वर्षांनी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या धावपट्टीचे डांबरीकरण, मजबुतीकरण व पुलाची दैनंदिन स्वच्छता ठेवणे, पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपांची दुरूस्ती व बंदिस्त गटारींची स्वच्छता करणे, पथदिव्यांची दुरूस्ती करणे हे काम एमएसआरडीसीचे आहे. मात्र शहरातील मनपा हद्दीत हे पूल असल्याने पुलांच्या देखभाल दुरुस्तीचे काम मनपाचे असा समज औरंगाबादकरांमध्ये आहे. मात्र शहरातील उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असताना एमएसआरडीसीचे अधिकारी या ठिकाणच्या दुरुस्तीची तसदी घेत नाहीत. परिणामी अवजड वाहतुकीमुळे येथील खड्डे खोलखोल होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या असतात. येथे उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नाकातोंडात धुळीचा त्रास सहन करावा लागतो.

जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाखाली मनमन खड्डे असताना हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाने लाखो रुपये खर्च करून व्हर्टीकल गार्डनची उभारणी केली. मात्र खड्ड्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एमएसआरडीसी प्रशासनाचा खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी जागे केले नाही. त्याउलट खड्ड्यालगत पुलाच्या भिताडांवर व्हर्टीकल गार्डन उभारण्यात आले. आधी येथे वारंवार उद्भवणाऱ्या अपघाताच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.

- राहुल इंगळे, समाजसेवक