Ravindra Chavan.
Ravindra Chavan. Tendernama
कोकण

'सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 249 कोटी'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिंधुदुर्ग (Sindhudurg) व कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ किमी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामास मंगळवारी मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या कामांसाठी २४९.१३ कोटीच्या खर्चाला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे हजारो पर्यटक तसेच नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

यांसदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामाच्या मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. तसेच वेळोवेळी आवश्यक पत्र व्यवहार केंद्रीय रस्ते वाहतून मंत्रालयाकडे करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री चव्हाण यांनी यांसदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी कि.मी. ६/००० ते ११/००० आणि १९/३०० (करुळ घाट सुरु) ते ३५/३०० (गगनबावडा) च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.५० कि.मी. व कोल्हापूर जिल्हातील ४.५० कि.मी. अशा एकूण २१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी करणे या २४९.१३ कोटी किंमतीच्या कामास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, दिल्ली येथील स्टँडीग फायनान्स समितीने आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असून मुख्यत्वे करुन साखर कारखानदारी व पर्यटनाच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्व आहे. या रस्त्यावर करुळ घाट असून येथे पडणाऱ्या ४००० ते ५००० मी.मी. पावसामुळे करुळ घाटाची अस्तित्वातील १० कि.मी. डांबरी रस्त्याची लांबी पावसाळ्यात वारंवार खराब होऊन वाहतूकीस अडथळे येत होते असे सांगताना मंत्री चव्हाण म्हणाले की, हा १० कि.मी. घाट लांबीमध्ये काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी ७ मी. रुंदीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार असून, उर्वरीत ११ कि.मी. लांबीमध्ये काँक्रिटीकरण पद्धतीने दुपदरी रस्ता आणि पेव्हड शोर्ल्डर्स असा एकूण १० मीटर रुंदीने काँक्रिटचा रस्ता तयार होणार आहे. यामुळे या मार्गावरुन दरदिवशी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाश्यांना याचा लाभ होणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.