Polluted Water
Polluted Water Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : दूषित पाणी आपल्या दारी! औरंगाबाद महापालिकेला झाले तरी काय?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेत संसर्गजन्य आजारासह इतरही आजारांचा प्रकोप वाढलेला असताना महापालिका प्रशासन स्वच्छतेबाबत उदासीन आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून येत असून, नळांद्वारे घरोघरी दूषित पाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जायकवाडी धरणातून शहरात पाणी पुरवठा केला जात असून, मागील काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत दूषित व गढूळ येत असल्याची नागरिकांमधून ओरड सुरू आहे. दूषित पाणी पिल्याने अनेक गंभीर आजार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरू असल्याच्या भावना शहरवासियांमधून व्यक्त होत आहेत. महापालिका प्रशासन रोगराईच्या काळात शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी शहरात दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. (Aurangabad Municipal Corporation)

शहरात नव्हेच तर जागतिक पातळीवर कोरोना या संसर्गजन्य आजाराचे अद्याप सावट सुरूच आहे. याशिवाय टायफाईड रोगाची साथही शहरात सुरू आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. सताड उघड्या असलेल्या नाल्या, त्यात साचलेली घाण, डुकरांचा मुक्त संचार, गल्ली मोहल्ल्यात व रस्त्यांच्या कडेला पडून असलेला केरकचरा आजारांना आमंत्रण देत असून अस्वच्छतेमुळे आजार आणखीच बळावत आहेत.

शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ लागल्याने 'घरोघरी आजारी' ही परिस्थिती उदभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग 'दूषित पाणी आपल्या दारी' हा उपक्रम राबवित असल्याचा आरोप केला जात आहे. शहराला पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून १६८० कोटी रुपये खर्चाच्या औरंगाबाद वाढीव पाणी पुरवठ्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यात न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शहरातील जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

जायकवाडी धरणातून शहराला करण्यात येत असलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असताना औरंगाबादकरांना सरळ नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे हे दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असून याकडे महापालिकेचे नवनियुक्त प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

काय म्हणतात तक्रारदार?

आम्ही सिडको एन - दोन एस.टी. काॅलनी प्रभागांतर्गत झांबड टाॅवर इमारतीत राहतो. गेल्या वर्षभरापासून दुषित पाण्याचा सामना करत आहोत. तक्रार करूनही महापालिकेकडून अंमलबजावणी केली जात नाही. आज तर नळाद्वारे विविधरंगी पाणी आल्याने घबराहट झाली. यासंदर्भात आम्ही परिसरातील सर्व नागरिकांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाण्याचे नमुने दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर आम्हीच सिडको एन -३, एन - ४ परिसरातील नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेत दूषित पाण्याचा देखील मुद्दा उचलणार आहोत. शहरात आठ दिवसातून एकदा पाणी मिळते. त्यात दुषित पाण्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. इकडे पाणीपट्टी भरुनही औरंगाबादकरांना खाजगी टॅकर आणि जारच्या पाण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. त्यात दवाखान्याचा खर्च वेगळाच.

- मनोज बोरा, उद्योजक