
नागपूर (Nagpur) : आरोग्य उत्तम राखण्यासाठी नागरिक सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी पहिली पसंती उद्यानाला देतात. परंतु नागपूरच्या काही उद्यानाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. ही उद्याने आहेत की जंगल तेही समजत नाही. सावरकर नगरच्या उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासने (NIT) दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील अनेक बगिच्यांची दुर्दशा अशीच झाली आहे. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या सावरकर नगरातील बगिच्यात जागो जगी झाडे झुडपे, कचरा पसरलेला आहे. आपण जंगलात आलो की बागेत हेच येथे आल्यावर कळत नाही. आवडी-तिडवी वाढलेली झाडे, जागोजागी पडलेले काटे यासह इतरही समस्यांमुळे याला उद्यान म्हणायचे का हा प्रश्न पडतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आबालवृद्धांसह साऱ्यांचा ओढा बगिच्यांकडे असतो, परंतु सावरकर नगरातील बगिच्यात आल्यावर हिरमोड होत असल्याने येथे येणाऱ्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच थायरॉईडसह पीसीओडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य सुदृढ राहावे म्हणून नागरिकांकडून विविध प्रकारचे उपाय केले जातात. अशावेळी तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची पावले ग्रीन जीमकडे वळतात. रोज सकाळ- संध्याकाळी शतपावली, योगा आणि इतर व्यायाम करताना ही मंडळी आपल्याला दिसून येतात.
नागपुरातील सर्वच वस्त्यांची स्थिती एवढी चांगली नाही. सावरकर नगरातील गार्डनही त्यापैकी एक. दोन एकरपेक्षा अधिक जागेत असलेल्या या गार्डनमध्ये पाण्याची व्यवस्था, फूल झाडे, लॉन, खेळणी तसेच बसायला खुर्च्या इत्यादी सुविधा आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गार्डनमध्ये अनावश्यक झाडे-झुडपे वाढली आहेत.
झाडे अजूनही तशीच पडून
नियमित फेरफटका मारण्यासाठी येणारे डी. एम. चव्हाण यांनी सांगितले की, नुकत्याच आलेल्या वादळानंतर जमीनदोस्त झालेली झाडे आजही त्याच अवस्थेत पडून आहेत. काही झाडे चक्क वॉकिंग ट्रॅकवर आडवी झालेली आहेत. त्यामुळे नागरिकांना येथून चालताना अडचण निर्माण होते. गार्डनमध्ये कचराकुंडी असूनही जागोजागी कचरा पडलेला असतो. झाडांची नियमित कटिंग व देखरेख होत नसल्याने झाडे अवास्तव वाढलेली आहेत. एवढेच नाही तर बगिच्यात कंबरेएवढे गवत वाढले आहे. अनेकदा तक्रार करूनही मनपा याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तयार करण्यात आलेले उद्यान नागरिकांची डोकेदुखी ठरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
ग्रीन जीम चुकीच्या जागी
ग्रीन जिमची फिटिंग तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे. काही साहित्य तुटलेले आहे. मनपाच्या जागेवर खासगी नर्सरी आहे. सहसा प्रशासनाच्या जागेवर खासगी नर्सरी लावू शकत नाही. परंतु या उद्यानात ती देखील आहे. व्यावसायिकसुद्धा आपल्या वस्तू ठेवण्यासाठी गार्डनचा उपयोग करतात. गार्डनमध्ये विहीर आहे; परंतु अनेक वर्षांपासून ती स्वच्छ न केल्याने त्यात घाणीचे साम्राज्य आहे. उद्यानातून नाला वाहतो. त्यावर स्लॅब नाही. निरीद्वारे त्यात पाणी स्वच्छ करण्याचे यंत्र लावण्यात आले, परंतु नाल्याची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे ते बंद झाले आहे. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत, अशा शब्दांत खुशबू यांनी संताप व्यक्त केला.
उद्यान प्रशस्त; मात्र खेळणी नावापुरतीच
उद्यानात आपल्या चिमुकल्यांसोबत आलेल्या खुशबू बकाले यांनी सांगितले की, मी रोज खेळण्यासाठी मुलांना गार्डनमध्ये घेऊन येते. मात्र, लहान मुलांसाठी पाहिजे तेवढी खेळणी नाहीत. जी काही आहेत, ती अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत. जिवावर उठलेल्या गार्डनमध्ये मुलांना खेळू देणे म्हणजे त्यांचा जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. एवढेच नाही तर गार्डनची देखभाल करायला कोणीही नाही. पथदिवे नसल्याने येथे रात्री फिरायला भीती वाटते. तसेच गायी आणि मोकाट जनावरे गार्डनमध्ये फिरतात व घाण करतात. खुर्च्याच्या बाजूला गवत व इतर झाडे वाढलेली असल्यामुळे तेथे बसता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.