
पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक कोंडी जरी सुटली, तरीही कोणत्या रस्त्याने जायचे या ‘कोंडीत’ वाहनचालक मात्र अजूनही अडकलेलेच आहेत. मार्गदर्शक फलक नसल्याने रस्ता चुकल्यावर वाहनचालकांना किमान दोन किलोमीटरचा फेरा पडतोय, यामुळे वेळही वाया जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून आठ रॅम्प, दोन सेवा रस्ता, दोन अंडरपास, चार पूल, १७ किलोमीटरचे रस्ते बांधले. मात्र, कोणता रस्ता, कुठे जातो हेच वाहन चालकांना समजत नाही. प्राधिकरणाने काही ठिकाणी फलक लावले आहेत. तर, काही रस्त्याजवळ अद्यापही फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे.
अशी आहे स्थिती
- १२ ऑगस्ट रोजी चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले.
- अजूनही रस्त्यावर मार्गदर्शक फलक लागले नसल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे.
- कोणता रस्ता, कुठे जातो हेच समजत नाही.
- राष्ट्रीय प्राधिकरणाने काही रस्त्यावर अगदी छोट्या आकाराचे फलक बसविले आहेत.
- पण ते वाहन चालकांच्या सहज नजरेस पडत नाही.
- त्यामुळे फलक लावण्याचा हेतू देखील साध्य होत नाही.
या ठिकाणी हवेत फलक
- वेदभवनच्या चौकात कोणतेच फलक नाही. या चौकातून एनडीए चौक, मुळशी, पाषाण व बावधनला जाता येते.
- कोथरूडहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर फलक नाही.
- एनडीए चौकात आल्यानंतर देखील वाहनचालक संभ्रमित होतात.
- बावधन व मुळशीकडे जाणारा रस्ता सहजरित्या लक्षात येत नाही.
- मुख्य रस्त्यांवर फलक लावण्यात आले आहेत. मात्र, रॅम्पच्या ठिकाणी फलक नाहीत.
आम्ही सर्वच ठिकाणी फलक लावलेले आहेत. वेदभवन चौकात काही दिवसांतच लावू. वाहनचालकांना जर अडचण येत असेल तर आवश्यक त्या ठिकाणी फलक लावले जातील.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे