
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील पार चाळणी झालेल्या रस्त्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खरोखर शब्द पाळला. या भागातील रस्त्यांवरून कामगार, उद्योजक आणि आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे. ये-जा करणाऱ्यांची पाठदुखी, मानदुखीसारख्या व्याधीतून सुटका होणार आहे. सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी मसिआच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रस्त्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला होता. त्यानुसार एमआयडीसीतील १८ मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ३९ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. यासोबतच शेंद्रा एमआयडीसीतील डीएमएलटी रोडचे काँक्रिटीकरण व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तसेच जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय वाल्मी ते बजाजगेट आदर्श पाटोदा गावातून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.
१९६५ मध्ये ६३३.१८ हेक्टर जागेवर स्थापण झालेल्या चिकलठाणा एमआयडीत ११०१ औद्योगिक तसेच ८५ वाणिज्य आणि ३७ निवासी भुखंड आहेत. एकुण १२२३ भुखंड होते. १९८२ च्या दरम्यान चिकलठाणा एमआयडीसीचे महापालिकेत रूपांतर झाले आणि येथील उद्योजकांकडून कोट्यावधी रूपये कर घेऊनही महापालिकेने मुलभुत सेवासुविधांकडे दुर्लक्ष केले. माजी उपमहापौर राजु शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बारा वर्षापूर्वी १४ कोटीच्या डीफर्ट पेमेंटमधुन १४ किमीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर शिंदे यांच्याच पाठपुराव्याने सरकारी अनुदानातून अनेक मुख्य रस्त्यांचे काम करण्यात आले. यानंतरही राजु शिंदे यांनी तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्याकडे तगादा लावत स्मार्ट सिटी प्रकल्पातून काही रस्त्यांची कामे मार्गी लावली. मात्र चिकलठाणा एमआयडीसीतील इतरही रस्ते उखडले गेल्याने कंपन्यांमध्ये काम करणा-या कामगारांना तसेच परिसरातील लोकांना पाठदुखी, मानदुखी व कंबरदुखीचा त्रास सुरू मोठ्या प्रमाणावर होता.
चिकलठाणा एमआयडीसीचे क्षेत्र आसपासच्या शेकडो गावांनी वेढलेले आहे. वसाहतीला लागूनच नारेगाव, मसनतपूर, ब्रिजवाडी, अशोकनगर या मनपा हद्दीतील वसाहतींप्रमाणेच गोपाळपूर, पिसादेवी, वरुड, आडगाव, महालपिंप्री, वरझडी, पोखरी, मांडकी अशी अनेक छोटी छोटी गावे आहेत. दूध, भाजीपाला, अन्य दैनंदिन वस्तू विकायला येण्यासाठी या सर्वच गावांतील लोक एमआयडीसीमधील रस्त्यांचा वापर करतात. त्यांनाही या रस्त्याचा प्रचंड त्रास होतो आहे. एमआयडीसीतील अंतर्गत आणि काही मुख्य रस्ते उखडले गेले आहेत. सहज गतीने चालणारा माणूस अचानक खड्डा आल्याने गाडीवरील मालासह पडतो. त्यात मधूनच पाऊस पडला की हे खड्डे पाण्याने भरतात. त्यामुळे तर रस्त्यावर खड्डाही लक्षात येत नाही. आसपासच्या वरील सर्व गावांमधील नागरिक मधला मार्ग म्हणून याच रस्त्यावरून ये-जा करतात.
मालाचे नुकसान
दूध, भाजीपाला आणणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. कित्येक वेळा दूधवाल्यांचे दूध खड्ड्यात गाडी अडकून पडल्याने सांडते. भाजीपालाही खड्ड्यात पडतो.
रुग्णांचेही हाल
याच भागात ईएसआय रुग्णालय आहे. आधीच आजारपणामुळे रुग्ण त्रस्त असतात. त्यातच रस्त्यांच्या भयंकर अवस्थेमुळे त्यांना खड्ड्यांचा सामना करीतच यावे लागते. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडते.
आजार जडले
रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने या भागातील कामगारांना तसेच रहिवाशांना आणि आसपासच्या गावांतील लोकांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी असे आजार जडले आहेत. कित्येकांना मणक्यात गॅप पडल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
उद्योगमंत्र्यांनी शब्द पाळला
आता मात्र तब्बल ५८ वर्षानंतर चिखलठाणा एमआयडीसीतील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. परिणामी उद्योजक , कामगार , ग्रामस्थ आणि येथील रहिवाशांचा त्रास आता संपनार आहे. सामंत यांच्या घोषनेनंतर एमआयडीसीतील १८ किमीचे रस्ते सिमेंट काॅक्रीटचे केले जाणार आहेत. यासह शेंद्रा एमआयडीसीतील रस्त्यांचेही भाग्य उजळणार आहे. विशेष म्हणजे पाटोदा गावातील रस्त्याचा देखील समावेश केला आहे.
उद्योजक अन् जिल्ह्यातील नेत्तृत्वाच्या पाठपुराव्याला यश
चिकलठाणा एमआयडीसीतील खड्डेमय रस्त्यांपासून सुटका व्हावी यासाठी येथील उद्योजकांनी खुप वर्ष लढा दिला. प्रत्येक वेळी सत्तेवर आलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. यासाठी शहराचे आमदार अतुल सावे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. सय्यद इम्तियाज जलील, मा. खा. चंद्रकांत खैरे, माजी उपमहापौर राजु शिंदे यांनी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा केला.
अखेर सामंत पावले
गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच हस्ते मसिआच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते चिकलठाणा एमआयडीसीत आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यानेही येथील खड्डेमय रस्त्यांचा अनुभव घेतला होता. त्याचवेळी येथील उद्योजकांनी सामंत यांच्याकडे रस्त्यांचा विकास करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी सामंत यांनी एमआयडीसी प्रशासनाला सर्व रस्त्यांचा सर्वे करून अंदाजपत्रकासह प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले होते. शेवटी त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत ३९ कोटी रूपये मंजुर केले. आज येथील विकासकामांचे भूमिपूजन दुपारी ४ वाजता मसिआच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.सामंत यांनी जरी रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजुर केला असला तरी हा निधी जळगाव एमआयडीसीच्या धर्तीवर चिकलठाणा आणि शेंद्रा एम आयडीसीतील उद्योजकांच्या सेवाकरातून वसुल केला जाणार आहे. याला उद्योजकांनी अनुमती दिली आहे.